काहीही म्हण पण तुझं असं वागणं बरं नव्हे,
दिवसा उजेडी ही तुझं अबोल राहणं खरं नव्हे.
काय म्हणावं मी या तुझिया अबोल्याला आता,
दिवसा असे त्या चंद्राकडे तुझं पाहणं खरं नव्हे.
तो अंगणातला मोगरा ही दरवळतोच की रोज,
आता द्वेषात असं सुगंधाला नाकारणं खरं नव्हे.
हल्ली म्हणे तुलाही आवडतो तोच तो तोच आता,
मला ही विसरत जाण्याचं ते तुझं कारण खरं नव्हे.
काय सांगू मी काळजाला हे घाव सोसण्याची कारणे,
विरहात ही रोज हसतोच आता माझं हसणं खरं नव्हे.
- कृष्णा जोशी